स्वामींची एक अप्रकाशीत पण बरीचशी माहिती असलेली लीला......
स्वामी सेवेत अनेक सेवेकरी होते. ते त्यांच्यापरीने सेवा करीत पण यात थोर असलेले श्रीमद् सद्गुरु श्री.बाळाप्पा महाराज यांच्या बद्द्लचा हा प्रसंग आहे. यांनी स्वामीसेवेची नीट व्यवस्था ठेवली होती. किंबहुना असे म्हणू की, स्वामींची सेवा कशी करावी याचाच परिपाठ यांनी सर्वांना घालून दिला जो आजही तसाच कार्यरत आहे.
रोज सकाळी भूपाळीने सुरवात करुन, स्नान वगैरे जी सेवा असायची यात बाळाप्पा, भुजंगा, चोळाप्पाचे जवाई श्रीपाद स्वामी, सुंदराबाई हे व इतर जण असावयाचे. प्रत्येकाकडे कामे ठारलेली असायची यात ढवळाढवळ चालायची नाही. कुणाचीही हिमंत नसायची ढवळाढवळ करायची.
रोज आरती व्हायचीच मग स्वामी कुठेही असोत यात खंड पडला नाही. आरती झाली की मग भक्तांनी समर्पित केलेला जो काही नैवेद्य असेल तो मात्र स्वामी स्वहस्ते वाटत, हेतू हा की सर्वांना स्वामींचे दर्शन मिळावे. हा प्रसाद वाटत असतांना बाळाप्पा नेहमी प्रसादाकरीता हात पुढे करीत पण स्वामींनी कधीही बाळाप्पाला प्रसाद दिला नाही. बाळाप्पा रोज मनात खट्टू होऊन त्यांच्या निवास स्थानी येत अन् आज ही आपणास प्रसाद मिळाला नाही म्हणून रडत बसत.
अशी बरीच वर्षे गेली रोज बाळाप्पा हात पुढे करीत अन् स्वामी काहिही देत नसत. एक दिवस मात्र बाळाप्पानीं ठरवले की काहिही होवो आज प्रसाद घेतल्याशिवाय परत फिरायचेच नाही. आरती झाली अन् दर्शन व प्रसाद घेण्याकरीता नेहेमीप्रमाणे भक्तगण स्वामींच्या भोवती गोलाकार उभे राहिले. स्वामी सर्वांना प्रसाद देऊ लागले. बाळाप्पानी काय केले असावे ? एक भक्ताच्या दोन पाया मधून हात घातला अन् प्रसादाची वाट पाहू लागले. हेतू हा की मी स्वामींना दिसूच नये. (वास्तवीक स्वामीच या सृष्टीचे चालक-पालक आहेत मग कुठलीही गोष्ट त्यांच्या पासून लपणे शक्यच नाही पण लिलाच करायच्या म्हटल्यानंतर त्यांना कोण अडवणार नाही का ?)
असो, स्वामी प्रसाद वाटत वाटत बाळाप्पाच्या हातापर्यंत आले अन् फक्त एक क्षण भरच स्वामी थांबले आणि दुस-याच क्षणी बाळाप्पांच्या हातात भली मोठी खारीक प्रसाद म्हणून पडली.
बस्स, एका क्षणात बाळाप्पांनी ती खारीक घट्ट पकडली व तेथून धुम ठोकली. न जाणो स्वामी पाहतील अन् मोठ्या कष्टाने मिळालेला प्रसाद स्वामी काढून घेतील.
बाळाप्पा आपल्या घरी आले, दरवाजा आतून बंद केला, हृदयाशी प्रसाद म्हणून मिळालेली खारीक घट्ट धरली व डोळे बंद करुन हमसुन हमसुन आनंदाने रडू लागले. “स्वामी का हो ईतुका वेळ लावलात या गरिबाला प्रसाद देण्यास. मज पामराकडुन असा काय अपराध घडला की मला येव्हढी वाट पाहावी लागली. हा मज पामराचे आज भाग्य ऊजळले मला स्वामींचा प्रसाद मिळाला”, असे म्हणत ते लहान मुलासारखे कितीतरी वेळ तो प्रसाद ग्रहण न करता तसेच रडत राहीले. त्यांची भाव समाधी लागली होती अन् तेवढ्यात दरवाजा जोरजोरात वाजू लागला. “बाळाप्पा दार उघडा… बाळाप्पा दार उघडा… स्वामींनी तुम्हांला असेल तसे बोलावले आहे…!”
झाले, बाळाप्पांनी ओळखले की स्वामींनी का बोलावले ते. त्यांच्यापुढे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता.
मान खाली घालून बाळाप्पा स्वामींपुढे हाताची मुठ धरुन उभे राहिले.
“हरामखोर हमसे नजर चुराके परसाद लेके जाताय तु बडा जिंद है. ना तु मुझे छोडेगा, ना मै तुझे, लाओ परसाद ला…”
बाळाप्पांनी ती खारीक स्वामींना देऊन टाकली. स्वामींनी ती खारीक घेतली आणि बाळाप्पाला अत्यंत प्रेमाने जवळ घेत म्हणाले, “अरे, तु या प्रसादाच्यामागे काय लागला आहेस जो प्रसाद तुला द्यायचा आहे तो मी कधीच दिला आहे. माझ्या मांडीवर तुला घेतले आहे. माझ्या मांडी शेजारीच मांडी घालून बस हाच तुला प्रसाद.” यानंतर बाळाप्पांनी कधीही प्रसादाचा हट्ट केला नाही.
ओळखलात का.. तो कुठला प्रसाद ?
स्वामींच्या समाधी शेजारीच समाधी घेण्याची परवानगी.!!
जी कोणालाही मिळाली नाही. !!
धन्य ते स्वामीगुरु अन् धन्य ते शिष्य बाळाप्पा .!!
“श्री गुरूदेव दत्त”
“स्वामी ॐ माऊली”
( सदर Post FaceBook मधील – “सुंदर विचारधारा” या Page वरील आहे.)